लातूर - शहराचा वाढता विस्तार आणि स्वच्छतेच्या दृष्टीने लातूर मनपाकडे स्वच्छता अभियानाअंतर्गत २५ घंटा गाड्यांची भर पडली आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने या गाड्या असल्याने कामात आणि वेळेतही बचत होणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला.
हेही वाचा - विलिनीकरणाला विरोध; सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून २ दिवसांच्या संपावर
स्वच्छता अभियानाअंतर्गत लातूर मनपाकडे ८२ घंटागाड्या आहेत. स्वच्छतेमधील सातत्य आणि मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा पुरस्कारही लातूर मनपाला मिळालेला आहे. या नव्याने देण्यात आलेल्या २५ घंटागाड्यांना जीपीएस, लाऊडस्पिकर असणार आहेत. त्यामुळे प्रभागानुसार घंटागाड्या गेल्या आहेत का नाही याची अचूक माहिती मिळणार असल्याचे मनपा आयुक्त एम. डी सिंह यांनी सांगितले. पालकमंत्री संभाजी पाटील यांनी या घंटा गाडीत बसून एक फेरफटकाही मारला. शिवाय यामुळे स्वच्छता मोहीम गतिमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केले. स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.