महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 15, 2021, 4:15 AM IST

ETV Bharat / state

2006 मध्ये कायदा आणणारे आता 'यू टर्न' घेत आहेत - भाजप खासदार उन्मेष पाटील

नवीन कृषी कायदे हे शेतकरी हिताचे आहेत. मात्र, विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकारण करत आहेत. सन 2006 मध्ये शेती सुधारणा कायदा आणणारेच आता 'यू टर्न' घेत आहेत, अशा शब्दात भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.

BJP MP Unmesh Patil
भाजप खासदार उन्मेष पाटील

जळगाव - नवीन कृषी कायदे हे शेतकरी हिताचे आहेत. मात्र, विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकारण करत आहेत. सन 2006 मध्ये शेती सुधारणा कायदा आणणारेच आता 'यू टर्न' घेत आहेत, अशा शब्दात भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.

प्रतिक्रिया देताना भाजप खासदार उन्मेष पाटील आणि आमदार सुरेश भोळे

हेही वाचा -जळगाव : राधाकृष्ण नगरात घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने काल सायंकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

तुम्ही शेतकऱ्याला चक्रव्युहात अडकवले

खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले, 2006 मध्ये तुमचे सरकार असताना 'मॉडेल एपीएमसी अ‌ॅक्ट' तुम्ही आणला. खासगी बाजार समित्यांना परवाने तुम्ही दिले. त्यांना शेतीमाल खरेदीचे परवाने देण्यात आले. करार शेतीला तुम्ही परवानगी दिली. परंतु, या सर्व गोष्टींना बळकटी देण्यात आली नाही. शेतकऱ्याच्या शेतीमालाला कमी भाव मिळाला तर तो कुठे जाईल, शेतीमालाला जास्त भाव मिळाला तर शेतीमाल बाहेर विक्री करण्यासंदर्भातली कुठलीही तरतूद केली नाही. उलट तुम्ही शेतकऱ्याला चक्रव्युहात अडकवण्याचे काम केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायदा आणून शेतकऱ्याला सक्षम करण्याचा प्रयत्न केला. शेती मालाची विक्री आणि खरेदीला संरक्षण देणारा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. पण, 2006 मध्ये कायदा आणणारे आता 'यू टर्न' घेत आहेत, असे खासदार पाटील म्हणाले.

नाहक राजकारण नको, वास्तव मांडण्याची गरज

2016 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी फळे व भाजीपाला नियमन मुक्त केला. त्यांना मार्केट कमिटी अॅक्टमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, तरीही गेल्या सहा वर्षात एकही बाजार समिती बंद पडली नाही. त्यामुळे, शेती विषयात राजकारणापलीकडे काम करण्याची गरज आहे. निवडणुका आल्या की राजकारण जरूर करूया. परंतु, आता वास्तव मांडण्याची गरज आहे, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पाबाबत बोलताना खासदार पाटील म्हणाले, केंद्र सरकारने सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा अशा सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 20 वर्षांत प्रथमच अर्थसंकल्पाचे शेअर बाजारातून स्वागत झाले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे, युवा भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे टाकलेले पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.

इथे प्रश्न सोडवायला वेळ नाही, तिथे खडसेंच्या आरोपांना उत्तर कसे द्यायचे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन संवाद यात्रेदरम्यान भाजप आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप आणि टीका केली होती. यासंदर्भात बोलताना खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. खडसेंनी सूड भावनेचे राजकारण न करता जिल्ह्याच्या विकासावर भर द्यावा, अशा शब्दात त्यांनी खडसेंना टोला लगावला. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

'त्या' नगरसेवकांनी नैतिकता दाखवून पक्षांतर करायला हवे होते - आमदार सुरेश भोळे

भुसावळातील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या संदर्भात बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले, या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना पळवाटा शोधल्या आहेत. त्यांनी नैतिकता दाखवून पक्षाचा राजीनामा देऊन मगच राष्ट्रवादीत प्रवेश करायला हवा होता. मात्र, त्यांनी नैतिकता दाखवली नाही. वर्षभरातच नगरपरिषदेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये जनता त्यांना उत्तर देईल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. ज्याप्रमाणे काहीजण सोडून गेले, त्याचप्रमाणे काही जण नव्याने पक्षात दाखल होतील, असा विश्वास देखील आमदार भोळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -जळगावात इंधनाचे दर भिडले गगनाला; पेट्रोल ९६.२७ वर

ABOUT THE AUTHOR

...view details