जळगाव -जिल्हा कारागृहातून पळून गेलेल्या तिघांपैकी एका कैद्याला पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सागर संजय पाटील (वय 24, रा. पैलाड, अमळनेर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून त्याच्या मुसक्या आवळल्या.
जळगाव जिल्हा कारागृहातून 25 जुलैला सकाळी साडेसातच्या सुमारास कैदी सुशील मगरे(वय 32, रा. कसबे पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील आणि सागर संजय पाटील (दोघे रा. अमळनेर) हे तिघे पळून गेले होते. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीवर असलेले रक्षक पंडित दामू गुंडाळे यांना मारहाण करत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून तिघा कैद्यांनी फिल्मी स्टाईल पलायन केले होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तिघांना पळून जाण्यासाठी त्यांचा साथीदार जगदीश पुंडलिक पाटील(वय 19, रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) याने मदत केली होती. जगदीशने अन्य एका मित्राच्या मदतीने तिघांना कारागृहात पिस्तूल, काडतूस पुरवले होते.