महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 13, 2021, 4:14 AM IST

ETV Bharat / state

मला नरेंद्र मोदींमध्ये स्वसंरक्षणासाठी तटबंदी उभारणारा नजीब खान दिसतो - जयंत पाटील

शेतकरी आपल्या अंगावर येऊन काहीतरी करतील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदी उभारून आत राहत आहेत. अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान यानेही 1771 साली मराठी फौजेपासून संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारली होती. म्हणून मला नरेंद्र मोदींमध्ये नजीब खान दिसत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Jayant Patil
जयंत पाटील

जळगाव - नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी 60 दिवसांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकरी आपल्या अंगावर येऊन काहीतरी करतील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदी उभारून आत राहत आहेत. अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान यानेही 1771 साली मराठी फौजेपासून संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारली होती. म्हणून मला नरेंद्र मोदींमध्ये नजीब खान दिसत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

मंत्री जयंत पाटील

हेही वाचा -जळगाव : मनपातील विविध समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मोदींवर डागले टीकास्त्र

नवीन कृषी कायदे, कामगार कायद्यातील बदल या विषयांवरून मंत्री जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. ते पुढे म्हणाले, 2019 मध्ये देखील नरेंद्र मोदींची लोकप्रियता होती, असे मानूया. कारण त्यांच्या खासदारांची संख्या जास्त होती. परंतु, त्यानंतर नरेंद्र मोदींनी 2 निर्णय घेतले. पहिल्या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला. त्यामुळे, तटबंदी उभारून मोदी आत राहत आहेत. स्टीलची रेलिंग असो, मोठमोठे खड्डे खोदून, तसेच अर्धा ते एक फुटापर्यंतचे खिळे उभारून मोदींनी तटबंदी तयार केली आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काहीतरी करतील, या भीतीने नरेंद्र मोदी तटबंदीत राहत आहेत.

1771 साली महादजी शिंदे यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल, या भीतीने अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान याने देखील अशीच तटबंदी उभारली होती. मला नरेंद्र मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. नरेंद्र मोदींनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर हा विषय इतक्या टोकाला गेला नसता, असेही ते म्हणाले.

कामगार कायद्यातील बदल अन्यायकारक

कामगार कायद्यांच्या बाबतीतही जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींनी कामगार कायद्यात केलेले बदल अन्यायकारक आहेत. ज्या कंपनीत 300 पेक्षा कमी कामगार असतील, त्या ठिकाणी युनियन करता येणार नाही. आजवर कामगारांच्या हिताचे, कष्टकऱ्यांना संरक्षण देणारे कायदे आपण केले. परंतु, मोदी सरकार त्या विरोधात काम करत आहे. ज्यावेळी देशातील शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा असंतोष आणि विरोध वाढत जाईल, तेव्हा मोदींची लोकप्रियता अजून कमी होत जाईल. देशातील बदलत्या वातावरणात आपणही आपली भूमिका लोकांपर्यंत जाऊन मांडायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

मला छळणे भाजपला महागात पडेल

मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला लक्ष्य केले. खडसे म्हणाले, नाथाभाऊला कसे तुरूंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे. आपण असे उद्योग केले नाहीत म्हणून भाजपला शोधूनही काहीही सापडले नाही. मला अडकवण्यासाठी छळणे सुरू आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्याबरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल, असा इशारा खडसेंनी दिला.

मेळाव्याला माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते.

हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा ताफा अडवला; पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details