हिंगोली - मृग नक्षत्र लागून 7 दिवस उलटून गेले. तरीही अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीसाठी मोठी तगमग होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची मोठ्या लगबगीने तयारी केली आहे. मात्र, पाऊस न पडल्यामुळे काहीसे वेगळे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी चातकांप्रमाणे पावसांची वाट पाहत आहेत.
मृग नक्षत्र कोरडाच, पेरणीच्या तयारीतील शेतकऱ्यांची वाढली तगमग
मृग नक्षत्र लागून 7 दिवस उलटून गेले. तरीही अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीसाठी मोठी तगमग होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील 3 ते 4 वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. क्विंटलाने होणारे मालाचे उत्पादन हे निसर्गाच्या अवकृपेमुळे किलोवर येऊन ठेपले आहे. वास्तविक पाहता हिंगोली जिल्ह्यात खरीपाच्या पिकालाच सर्वाधिक जास्त महत्त्व आहे. खरीप हंगाम हा रोपे वाढीसाठी अनुकूल हंगाम असतो. या हंगामात जे रोपे टाकले जातील त्यांची निश्चितच वाढ होते, तसेच या काळात पिकांना पावसाचे हक्काचे पाणी असल्याने ही शेतकऱ्याला याचा फायदा होतो. त्यामुळे शेतकरी याच हंगामावर सर्वाधिक जास्त अवलंबून असतो.
जिल्ह्यात खरीपाचे 3 लाख 85 हजार एवढे पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनचे सव्वा दोन लाख तर 44 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीचे आहे. मात्र, पाउसच नसल्याने शेतकऱ्यांनी शेती नीट केलेली असली तरी अजून बियाणांची खरेदी केली नाही. मागील वर्षी 15 जूनपर्यंत उभार खरिपाची पेरणी आटोपली होती. मात्र, यंदा पेरणीला कुठेही सुरू झाली नाही. तर कृषी केंद्रतील बियाणांची 10 ते 15 टक्के देखील विक्री झाली नाही.