गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर याची पत्नी रामको २७ एप्रिलला झालेल्या चकमकीत ठार झाली होती. यामुळे संतापाच्या भरात त्याने १ मेला झालेला भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
गडचिरोली हल्ला : पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचला भास्करने कट ?
नक्षलवाद्यांच्या प्रमुख भास्कर याची पत्नी एका चकमकीत ठार झाली होती. याचा बदला घ्यावा म्हणून भास्करने १ मेला भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
जांभूळखेडा येथे १ मे रोजी झालेल्या भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई व एक वाहन चालक यांना वीरमरण आले. हे प्रकरण तसेच दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याप्रकरणी भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशद्रोह आणि अन्य कलमांखाली पुराडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर सकाळी ११ वाजता कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या नक्षली हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे.