चंद्रपूर- लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना राज्यात परत आणण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे आदेश मंत्री वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार
देशात अचानक लागू केलेल्या लॉकडाउनमुळे उच्च शिक्षणासाठी आंध्र प्रदेशातील विजयवाडा, दिल्ली, पुणे, मुंबई यांसह राज्यातील इतर जिल्ह्यात गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तत्काळ स्वगृही आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
देशात अचानक लागू केलेल्या लॉकडाउनमुळे उच्च शिक्षणासाठी आंध्र प्रदेशातील विजयवाडा, दिल्ली, पुणे, मुंबई यांसह राज्यातील इतर जिल्ह्यात गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तत्काळ स्वगृही आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्य सचिव अजय मेहता, प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना पत्राच्या माध्यमातून केली होती.
आंध्रप्रदेश राज्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार तर तेलंगणा राज्यात 2 हजार मजूर मागील 4 महिन्यांपासून अडकले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारला पत्र देऊन सतत पाठपुरावा केला होता. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांना पत्र देऊन पाठपुरावा करण्यास सांगितले होते. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थ्यांचा घरवापसीचा मार्ग मोकळा झाला असून या सर्वांना आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत असून वडेट्टीवार संबधित विभागांशी चर्चा करत आहेत.