चंद्रपूर - ग्रामीण भागात संचारबंदी सुरळीत राहावी याची जबाबदारी पोलीस पाटलांना देण्यात आली आहे. मात्र, शहरालगत असलेल्या अजयपूर येथे पोलीस पाटलाकडूनच याचे उल्लंघन करण्यात आल्याची घटना समोर आली. तेराव्याच्या कार्यक्रमात जेवणातून तब्बल 40 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांना जवळच्या चिचपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तर काही जणांवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशासह राज्यावरही कोरोनाचे संकट घोंगावत असताना ग्रामीण भागात यातून कुठलाही बोध घेतला जात नसल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अजयपुर येथील पोलिस पाटलाच्या घरी तेरव्या दिवसाचे जेवण होते. यासाठी गावाला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दुपारपासून जेवण केलेल्या लोकांना मळमळ उलट्या व तापाचा त्रास सुरू झाला.