बुलडाणा - जिल्ह्यात मंगळवारी १७ मार्चला झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती देऊन त्याच्या भरपाईची मागणी करणार असल्याचे विधानसभेचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची माहिती देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
मंगळवारी अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील डिडोळा, महाल पिंपरी, तालखेड, तळणी, माकोडी, जहागिरपुर, टेंभी, शेलगाव बाजार, सावरगाव, आड विहीर या गावांना आ.संजय गायकवाड यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. याचप्रमाणे तालुक्यातील धामणगाव देशमुख, वरुड जनुना या भागात अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना दिल्या. त्यानंतर तहसील कार्यालय मोताळा येथे मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन याबाबतीत सर्वांनी तातडीची कारवाई करावी, असे आदेश दिले. हाताशी आलेले पीक गेल्यामुळे याभागातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. शासनाकडून शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन देऊन, या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चाकरू असे सांगितल.