महाराष्ट्र

maharashtra

शिक्षकांच्या कोरोना टेस्टचा तिढा सुटला; आता आरटीपीसीआरसह अँटीजन टेस्टही करता येणार

शिक्षण विभागाने ठरविल्यानुसार 23 तारखेला भंडारा जिल्ह्यातील शाळ उघडल्या. मात्र, शाळेत विद्यार्थी पोहोचले नाही. विद्यार्थी नसलेल्या आणि कोरोनाच्या भीतीने धास्तावलेल्या शिक्षकांची भरलेली शाळा पाहून प्रशासनालाही नक्कीच चिंता वाटली असावी. म्हणूनच आता शिक्षकांची आरटीपीसीआरऐवजी अँटीजेन चाचणी करून शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पत्र काढले आहे.

By

Published : Nov 24, 2020, 5:33 PM IST

Published : Nov 24, 2020, 5:33 PM IST

corona test
कोरोना चाचणी (प्रतिकात्मक)

भंडारा -जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या. मात्र, शिक्षकांच्या कोरोना टेस्ट झाल्या नसल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई केली आहे. जोपर्यंत शिक्षकांच्या कोरोना टेस्ट होणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. यानंतर शिक्षकांच्या अँटीजेन टेस्ट करण्यालाही जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याबाबत भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी एक पत्रक काढले आहे.

आता आरटीपीसीआर सह अँटीजेन टेस्टही करता येणार -

शिक्षण विभागाने ठरविल्यानुसार 23 तारखेला भंडारा जिल्ह्यातील शाळ उघडल्या. मात्र, शाळेत विद्यार्थी पोहोचले नाही. विद्यार्थी नसलेल्या आणि कोरोनाच्या भीतीने धास्तावलेल्या शिक्षकांची भरलेली शाळा पाहून प्रशासनालाही नक्कीच चिंता वाटली असावी. म्हणूनच आता शिक्षकांची आरटीपीसीआरऐवजी अँटीजेन चाचणी करून शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पत्र काढले आहे. कंटेनमेंट झोनमधील, कोरोनासदृश्य लक्षणे असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी करूनच शाळेत येता येईल, असा आदेश आहे.

केवळ 19 हजार पालकांनी दिले संमती पत्र -

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 342 शाळा आहेत. त्यात 66 हजार 56 विद्यार्थी आहेत. यापैकी 19 हजार पालकांकडून संमती पत्र मिळाले आहे. पहिल्या दिवशी दोन हजाराच्या घरात विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये उपस्थित होते, असे प्रशासन सांगत असले तरीही शाळा केवळ उघडल्या गेल्या. कारण शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करून नकारात्मक असलेला अहवाल सादर केल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संख्या 6000 आहे. इतक्या सर्व लोकांच्या आरटीपीसीआर चाचणी आठवडाभरात पूर्ण करणे अशक्य होते. आरोग्य विभागातील मर्यादा आणि उशिरा येणारे चाचणीचे अहवाल पाहता ही चाचणी करून शाळा सुरू करणे कदाचित संयुक्तिक नव्हते. म्हणूनच अखेर जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर ऐवजी ‌अँटिजेन चाचणीचा अहवाल ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्षणे असणाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर आवश्यक -

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबत एक पत्र काढले आहे. त्यात भंडारा शहर किंवा जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात वास्तव्य करणारे आणि कोरोनाची संभाव्य लक्षणे दिसत असलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चाचणी करावी. तसेच अन्य सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अँटीजेन चाचणी करून तो अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अँटिजेन चाचणीचा नकारात्मक आलेला शाळा व्यवस्थापनाकडे सादर करून आता या शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे नक्की तोकड्या शिक्षकांमध्ये भरवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आता पूर्ण शिक्षकांची उपस्थिती दिसण्याची शक्यता आहे. अनेक शिक्षक संघटनांनी चाचणी हा विषय कळीचा करून शिक्षक शाळेत जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता अँटिजेन चाचणी करून शिक्षकांना शाळेत जावेच लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे लवकरच जिल्ह्यातील शाळा पूर्ण शिक्षक यांच्या उपस्थितीत सुरू होऊ शकतील. मात्र, केवळ 40 टक्के पालकांनी संमती दिली आहे. आगामी काळात किती पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details