बीड- माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या. मात्र बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे देत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन 'पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?' असा प्रश्न विचारला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकर्यांची हेळसांड होत असल्याने शेतकऱ्यांना आता चक्क आत्महत्या करण्याची परवानगी मागण्याची वेळ आली आहे.
'पीक विम्याची भरपाई द्या, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या'; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पिक विमा अजूनही मिळालेला नाही. बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवा-टोलवीची उत्तरे देत आहेत. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन 'पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?' असा प्रश्न विचारला आहे.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावातील हजारो शेतकरी एकत्र आले. आणि विमा कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागत थेट जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली आहे. येत्या 14 जुलै पर्यंत विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 15 तारखेला दिंद्रुड बसस्थानक येथे सर्व शेतकरी लाक्षणिक उपोषण करेल. आणि या उपोषणानेही आमचा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी असे गंभीर विधान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केले आहे.
या सगळ्या घटनेनंतर देखील जिल्हा प्रशासनाला घाम फुटलेला नाही. पिक विमा कंपनी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीत शेतात कशी तरी पेरणी केली आहे. पण मशागतीसाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ची रक्कम मिळण्याची आशा धुसरच आहे.