बीड- जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर चक्क ८ दिवसापासून शेतकरी रांगा लावून बसले आहेत. यंदा कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नाही आणि दुसरीकडे आमची हेळसांड होत आहे, अशा प्रतिक्रिया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिल्या आहेत.
मंगळवारी शहरातील एस.आर. कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाची वाहणे मागील ८ दिवसापासून नंबरला लागलेली आहेत. मात्र, कापसाचे माप होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, आठवड्यातील दोन ते तीन दिवस शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कापसाची गुणवत्ता घसरलेली असल्याचे सांगत प्रति क्विंटलमागे दोनशे-तीनशे रुपये कमी भाव दिला जात आहे.