महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्रकार ते खासदार व्हाया आमदार; वाचा, इम्तियाज जलील यांचा प्रवास

१९९१ ते २००३ या काळात एका वृत्तपत्रात त्यांनी काम केले. त्यानंतर पुण्यात २००३ ते २०१४ या काळात एका वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम केले. पत्रकारिता करत असताना त्यांनी राजकारण जवळून पाहिले.

By

Published : May 27, 2019, 8:33 PM IST

पत्रकार ते खासदार इम्तियाज जलीलचा प्रवास

औरंगाबाद - औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास कमी काळात बहरत गेला. साडेचार वर्षांपूर्वी पत्रकार म्हणून ओळख असलेले इम्तियाज जलील सुरुवातीला आमदार आणि आता खासदार झाले. पत्रकार ते खासदार असा प्रवास त्यांनी केला. त्यांची हुशारी त्यांच्या आमदारकीच्या काळात दिसून आली. आता तीच हुशारी खासदार म्हणून काम करत असताना कशी दिसेल, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

इम्तियाज जलील यांचा प्रवास

एमआयएमसारख्या जातीयवादी समजल्या जाणाऱ्या पार्टीत येऊन अवघ्या २५ दिवसात आमदार म्हणून निवडून आले. त्याचप्रमाणे कोणालाही अपेक्षीत नसताना ऐनवेळी लोकसभा लढवून अवघ्या १५ दिवसात खासदार म्हणून निवडणून येणे, हे भल्याभल्यांना अचंबित करण्यासारखे आहे.

इम्तियाज जलील हे औरंगाबादचे रहिवासी आहेत. १० ऑगस्ट १९६८ ला जन्मलेल्या सय्यद इम्तियाज जलील यांनी पत्रकारितेच्या पदवीसह, एम. कॉम. आणि एमबीएच शिक्षण घेतले. १९९१ ला पत्रकारितेच्या क्षेत्रात पाय ठेवला. १९९१ ते २००३ या काळात एका वृत्तपत्रात त्यांनी काम केले. त्यानंतर पुण्यात २००३ ते २०१४ या काळात एका वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम केले. पत्रकारिता करत असताना त्यांनी राजकारण जवळून पाहिले. या दरम्यानच्या काळात एमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांच्याशी निर्माण झालेल्या चांगल्या संबंधामुळे औरंगाबाद मध्यची विधानसभा लढवण्याची संधी त्यांना मिळाली. औरंगाबाद मध्य तसा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजपची युती तुटली आणि तीच इम्तियाज यांच्या पथ्यावर पडली. त्यावेळचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांच्यात मतविभाजन झाले आणि इम्तियाज जलील यांची लॉटरी लागली आणि अवघ्या २५ दिवसात पत्रकाराचे आमदार झाले.

साडेचार वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांची अभ्यासू आमदार म्हणून ओळख झाली. २ ऑक्टोबर २०१८ रोजी औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा झाली आणि लोकसभा निवडणूक रंगतदार होणार याची चाहूल लागली. वंचितकडून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली. मात्र, त्यावेळी औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमला मिळावी, यासाठी इम्तियाज यांनी दबावतंत्र वापरले आणि ते यशस्वी देखील झाले. प्रचाराच्या सभांमध्ये इम्तियाज यांनी शहराच्या विकासाच्या मुद्यावर बोलायला सुरुवात केली. इम्तियाज जलील यांचे निवडून येणे सहज शक्य नव्हते. त्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आणि मतांचे मोठे विभाजन घडले. या विभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली.
हुशार आमदार म्हणून ओळख निर्माण केलेल्या इम्तियाज जलील यांना स्वप्नातही वाटले नव्हते शहराचा खासदार होण्याचा मान त्यांना मिळेल. मात्र पत्रकार ते खासदार असा प्रवास त्यांनी केला. आता त्यांच्या पत्रकारितेत झालेला राजकीय अभ्यास आणि आमदारकीचा अनुभव शहराचा किती विकास करतो, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details