औरंगाबाद- सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रकरणाबद्दल माहिती देताना वकील सरकारी जमीन बेलखंडी मठाला बक्षीस दिली होती. तीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. खरेतर बक्षीस मिळालेल्या कुठल्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र, येथे दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचे याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी याचिकेत म्हटले आहे.
जमिनीवर पीक होत असताना त्या जमिनीला नापिक बनवण्यात आली आहे. याप्रकरणी फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधीत पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आज त्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
धनंजय मुंडे यांच्या वकिलाशी संपर्क साधला असता, जमिनीच्या सातबाऱ्यावर कुठेही ही जमीन बक्षीस असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.