महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युवतींना भरचौकात चाकूने भोसकले जात आहे, मात्र मुख्यमंत्री धृतराष्ट्र झालेत - सक्षणा सलगर

राज्यात युवतींवर हल्ले होत आहेत. मात्र, गृह खाते स्वतःकडे ठेवणारे मुख्यमंत्री धृतराष्ट्र झाले आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशप्रमुख सक्षणा सलगर यांनी संताप व्यक्त केला.

By

Published : Jul 17, 2019, 3:19 PM IST

सक्षणा सलगर

अमरावती- भरचौकात युवतींना चाकूने भोसकले जात आहे. त्यांच्यावर गरम तेल ओतले जात आहे. अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवती, महिला आज दहशतीत जगत आहेत. त्यांचे वस्त्रहरणच नव्हे तर हत्यादेखील केली जात असताना गृह खाते स्वतःकडे ठेवणारे मुख्यमंत्री मात्र धृतराष्ट्र झाले आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशप्रमुख सक्षणा सलगर यांनी संताप व्यक्त केला आहे.

सक्षणा सलगर

राष्ट्रवादी काँग्रेसची अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासह जिल्ह्यातील युवतींशी संवाद साधण्यासाठी सक्षणा सलगर जिल्ह्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.

अमरावती जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी युवतीची भरचौकत चाकू भोसकून हत्या झाली होती. या हत्येची माहिती सलगर यांनी घेतली. तसेच वरुड येथे महाविद्यालयातील युवतींशी संवाद साधून त्यांनी युवतींच्या समस्या जाणून घेतल्या. युवतींवर हल्ले होत असताना पोलीस यंत्रणा झोपी गेली आहे का?, महिला आणि युवतींसाठी असणारे छेडछाड मुक्ती पथक कोठे गेले आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात युवती, महिला धास्तावलेल्या दिसत आहेत. कुठलीतरी भीती युवतींच्या मनात आहे. आज राज्यात युवती, महिला सुरक्षित नाहीत. आजचे सरकार हे आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे सरकार असल्याचे सांगत मिरवते आहे. मात्र, आज खरोखर शिवाजी महाराज असते तर त्यांनी युवतींना छेडणाऱ्यांचा, त्यांना चाकुने भोसकणाऱ्यांचा चौरंगा केला असता. पण आज परिस्थिती कठीण आहे. महाविद्यालयातील मुली तोंडातून ब्र काढायला तयार नाहीत इतक्या घाबरल्या आहेत, असेही सलगर म्हणाल्या.

दुर्योधन, दुष्यासन राज्यात वावरत असताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर असणारी पट्टी काढण्यासाठी मी स्वतः मुंबईत जाईल आणि हा काय नेमका प्रकार सुरू आहे याबाबत जाब विचारणार आहे, असेही सक्षणा सलगर म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details