अमरावती - तिवसा तालुक्यातील शेंदुरजना बाजार येथे सूर्यगंगा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. परंतू वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्री पडलेल्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक ठप्प पडली आहे.
सुर्यगंगा नदीवरील केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे जुना लहान पूल पाडून त्याजागी नवीन उंच पूल बांधण्याचे काम गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एक पर्यायी पूल बांधण्यात आला. मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने सुर्यगंगा नदीला पूर आला. त्यामुळे पर्यायी बांधलेला पुला खचून गेला.
पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदाराने हा पर्यायी पूल निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे पहील्याच पुरात वाहून गेला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेक गावातील संपर्क तुटला आहे. तिवसा बांधकाम विभागाचे सदर बांधकामावर दुर्लक्ष असल्याने कंत्राटदाराने जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नविन पुलामध्ये वापरला आहे. त्यामुळे नविन पुल सुद्धा धोकादायक ठरू शकतो. यापुलाच्या बांधकामावर बांधकाम विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.
पुलाचे बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे होत असल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तिवसा - चांदुर रेल्वे राज्यमहामार्ग आहे. त्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहन धावतात. मात्र पुरामुळे पूल खचल्याने वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली आहे.