अमरावती -शेतकरी कायदे मागे न घेण्यामागे विदेशी शक्तीचा दबाव आहे. जर विदेशी शक्ती एकत्र होऊन मोदींना टार्गेट करत असतील तर त्यांनी स्पष्ट सांगावे. आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असा टोला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लगावला आहे. २६ जानेवारीला दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांसोबत जी दडपशाही झाली, ती पोलिसांनी केली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली आहे. या आंदोलनामागे विदेशी शक्ति आणि दहशतवादी असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, वास्तवात तसे नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना बच्चू कडू कायदे रद्द न करण्यामागे कारण काय ?
मागील दोन महिन्यांपासून हे शेतकरी आंदोलन सुरू आहे. यात शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरी सरकार कायदे मागे घेत नाही. यामागे काय कारण आहे? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. मोठ्या प्रमाणात विरोध होत असूनही सरकार कायदे मागे घेत नाही, याचा अर्थ नक्कीच विदेशी भांडवलदारांचा दबाब आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
शेतकरी पुन्हा दिल्ली सीमेवर -
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, आज (शुक्रवार) पहाटे तीन वाजल्यापासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.