शिर्डी- लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला साईबाबांचा तिसऱ्यांदा आशीर्वाद मिळाला. गेल्या निवडणुकीत नवखे असुनही पंधरा दिवसात खासदार झालेले सदाशिव लोखंडे यावेळी मतदारसंघात संपर्क कमी असतानाही विजयी झाले. राधाकृष्ण विखेंची निवडणुकीपूर्वी ४८ दिवसांमध्ये मिळालेली भक्कम साथ दुसऱ्यांदा विजयी होण्यासाठी मोलाची ठरली. सदाशिव लोखंडे हे तब्बल १ लाख २१ हजार मतांनी निवडून आले.
शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील पाच वर्षांत विकासाची अनेक कामे केली. मात्र, मतदारसंघात सुरुवातीची तीन वर्षे त्यांचा संपर्क फार कमी होता. पुढे शेवटीच्या दोन वर्षांत त्यांनी चांगलाच संपर्क वाढवला. त्यातच मतदारसंघातील निळवंडे धरणासाठी केंद्रीय स्तरावरुन २८०० कोटींचा निधी मिळविण्यात आलेले यश त्यांच्यासाठी लाभदायक ठरले. पुढे लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेनेने त्यांनाच संधी दिली.
या दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राधाकृष्ण विखेंनीही काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे शिर्डी मतदारसंघाचे चित्रच पालटले. अहमदनगर दक्षिणेतून सेनेने सुजयला मदत करावी आणि उत्तरेतून विखेंनी लोखंडेंना निवडून आणायचे असा अलिखित तहच झाला. त्यानुसार नगरचे मतदान झाल्यानंतर विखे पितापुत्रांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपली यंत्रणा सक्रीय केली. त्यामुळे लोखंडेना शिर्डीतून तब्बल १ लाख २० हजार मतांचे मताधिक्य मिळाले.
थोरांतचा प्रभाव नाहीच -
काँग्रेसने श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती. कांबळे हे विखे समर्थक असले तरी त्यांची उमेदवारी आणि निवडणुकीतली संपुर्ण यंत्रणा ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची होती. मात्र, निवडणुकींचा निकाल पाहिल्यास संगमनेर विधानसभा मतदार संघातूनच सेनेच्या उमेदवाराला साडे सात हजार मतांचा लिड आहे. मागील निवडणुकीशी तुलना करता तो पन्नास हजारांच्या लिडच्या मानाने कमी आहे. मात्र, थोरांतांचे मतदारांनी ऐकलेले नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पराभवाची कारणमिमांसा केल्यास असे दिसून येते की राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयत्यावेळी काँग्रेसला धक्का दिल्याने भाऊसाहेब कांबळे यांच्या विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर येथील ससाणे गटानेही कांबळेना मदत केली नाही. तसेच आघाडीतील नेत्यांनी प्रामाणिकपणे कांबळेंचे काम केले नाही. तसेच स्वत: कांबळेच्या विधानसभा मतदारसंघातून वीस हजारा मतांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघा पैकी काँग्रेसला राष्ट्रवादीचा किल्ला असलेल्या अकोलेतून फक्त आघाडी मिळाली आहे. मतांच्या आकड्यांचा हिशेब पाहिला असता, तर वंचित बहुजन आघाडीच्या संजय सुखधान यांनी तब्बल ६२ हजारांहुन अधिक मते घेतली आहेत. परिणामी काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. या निवडणुकीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही अपक्ष उमेदवार म्हणुन होते. मात्र, त्यांना केवळ ३५ हजार मते मिळाली आहेत. नगरनंतर मोठ्या चर्चेच्या ठरलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात अखेर युवकांचे मतदान तसेच विखेंची यंत्रणेशिवाय मोदींचे स्थिर सरकार हाच फॅक्टर खरा ठरल्याचे चित्र दिसत आहे.