अहमदनगर -अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र, रतनवाडी, रतनगड या परिसरात कोरोना संक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. म्हणून, शनिवार-रविवार या दिवशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे.
अकोले तालुक्यातील शेंडीवन विश्रामगृह येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी सरपंच, पोलिस पाटील, वन समिती यांचे अध्यक्ष, सदस्य वन अधिकारी कर्मचारी व पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी बैठक घेतली. या बैठकीत येत्या शनिवार-रविवार पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटनासाठी बंद राहणार आहे, असा ठराव संमत करण्यात आला. तर मद्यपान करुन रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.