शेवगाव (अहमदनगर) -जगात भाऊ-बहिणीचे नाते अतूट मानले जाते. रक्षाबंधानावेळी बहीण ही भावाच्या मनगटावर राखी बांधते व भाऊसुद्धा बहिणीच्या प्रत्येक अडचणीत रक्षा करण्याचे वचन देतो. दोन वेगळ्या धर्मातील भावा-बहिणीचे असेच प्रेम पाहायला मिळाले. सख्खा भावाचे निधन झाल्याने गावातील बाबा जब्बार पठाण याला भाऊ मानत त्याला राखी बांधली, तर बाबानेही सविता या आपल्या बहिणीच्या सुख-दुःखात धावण्याचे वचन दिले. नुकतेच सविताच्या दोन मुलींचे लग्न झाले. यावेळी मामा या नात्याने बाबा पठाण यांनी कन्यादान केले. यावेळी सासरी जाणाऱ्या भाचींकडे पाहून त्यांचेही अश्रू अनावर झाले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे मानलेल्या बहिणीच्या मुलींची सासरी पाठवणी करतानाच्या या मामाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. जाती, समाजामध्ये विष कालवणाऱ्या समाजकंटकांच्या तोंडावर हे फोटो म्हणजे एक चपराकच असल्याचे समाज माध्यमांमध्ये बोलले जात आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही याची दखल घेत आपल्या फेसबूक पेजवर फोटो शेअर केले. तसेच हीच आपल्या देशाची संस्कृती, हीच आपल्या देशाची ओळख, अशी पोस्ट टाकत बाबा पठाण यांचे कौतूक केले.
बोधेगाव येथील सविता भुसारी यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या दोन मुली गौरी व सावरी यांचे लग्न झाले या लग्न सोहळ्यात सुपारी फोडण्यापासून ते मुलींना सासरी पाठविण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या मानलेल्या मामाने पार पाडल्या. मुंगी येथील जाधव परिवारातील दोन भावांना हुंडा न घेण्याच्या व मुलींचे शिक्षण पुढेही सुरू ठेवण्याच्या अटीवर हे विवाह लावण्यात आले. लग्नानंतर सासरी जाताना त्या दोन्ही मुलीही मामाच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्या. दोघी रडताना मामाचेही अश्रू अनावर झाले.
सविता व बाबा या दोन्ही भावा-बहिणीचे हे नाते जातीभेदाच्या पलीकडचे. म्हणूनच गौरी, सावरी व दोघींचा भाऊ करण यांना पठाण मामा वेगळ्या जातीचे कधीच वाटले नाहीत. सख्ख्या मामाप्रमाणे पठाण मामांनी सर्व जबाबदारी पार पाडली, असे मुली सांगतात.
बाबा पठाण गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात. गेल्यावर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा तसेच शिवजयंतीत भगवा झेंडा घेऊन सगळ्यांच्या पुढे असलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बाबा पठाण हे पाच वेळेचे नमाजी आहेत. ते अल्लाहला मानतात. पण, आपण ज्या मातीत राहतो ती माती आपली आई आहे. समाजातील सर्व व्यक्ती आपले भाऊ-बहीण आहेत. जगात फक्त माणुसकी हीच जात असल्याचे सांगत ते सर्वधर्मीय उत्सवात आपला सक्रिय सहभाग नोंदवतात.
अलीकडच्या जातीय असहिष्णुतेच्या वातावरणात बंधुभाव दुर्मिळ होत चालला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक द्वेषाने वावरणाऱ्या मानसिकतेमुळे जातीय तेढ निर्माण केली जाते. पण, देशातील सामाजिक वटवृक्षाची बीजे ही प्रेमाने रोवलेली आहेत. त्यांना अशा कृतीतून जपण्याचे काम बाबा व बोधेगाव ग्रामस्थांसारखे लोक करत आहेत. हेच यातून अधोरेखित होते.
हेही वाचा -दूध उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना पत्रे, आमदार मोनिका राजळेंची उपस्थिती