अहमदनगर (शिर्डी) - शेती व्यवसायला जोड धंदा म्हणून दुग्धउत्पादन घेतले जाते. मात्र, आता शेतीमालासोबतच दुधालाही भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदी काठच्या डोणगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी 1 ऑगस्टपासून 'दूध बंद' आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे.
दुधाला मागणी असूनही केवळ कोरोनाच्या नावाखाली योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जनावरांचा चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चाच्या ओझ्याखाली शेतकरी दबू लागला आहे. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याचा फायदा गावातील दूध उत्पादकांना होत नाही. खासगी दूध संघासह जिल्हा दूध संघही या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर 15 ते 20 रुपये भाव मिळत आहे. सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याचा आरोप करत दूध उत्पादक शेतकरी संप करणार आहेत, असे डोणगाव दूध संपाचे प्रणेते धनंजय धोर्डे यांनी सांगितले. दूध उत्पादकांच्या चार मागण्या आहेत. 31 जुलैपर्यंत सरकारने याकडे लक्ष न दिल्यास 1 ऑगस्टपासून आम्ही 'दूध बंद' आंदोलन सुरू करणार असल्याचे धोर्डे यांनी सांगितले.