अहमदनगर -मुली आणि महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामागे दोषींना तत्काळ फाशीसारखी शिक्षा होत नसल्याचेही एक कारण आहे. सरकार कुणाचेही असो, दोषींना तत्काळ फाशी दिली जावी, अशी आम्हा पीडित कुटुंबाची इच्छा असल्याचे कोपर्डीतील निर्भयाच्या माता-पित्याने केली आहे. हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली.
सध्या देशभर उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणामुळे संतापाची लाट आहे. हाथरस घटनेनंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, योगी सरकार यांचे वागणेही संशयास्पद आहे. विरोधी पक्षांनी आरोपींविरोधात तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर 16 जुलै 2016 ला नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील निर्भया प्रकरणातील पीडित कुटुंबाने हाथरस येथील कुटुंबासाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. गुन्हेगार कोणत्याही जाती-पातीचे असोत, तत्काळ शिक्षेची अंमलबजावणी होत नसल्यानेच अशा घटना वारंवार होत असल्याचा दावा निर्भयाच्या आई-वडिलांनी केला.