कोपरगाव (अहमदनगर) -आपण अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रकार बघितला आहे. हे फक्त चित्रपटात होऊ शकते असा आपला समज असेल. मात्र, असाच काहीसा प्रकार कोपरगाव शहरात झाला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे याबाबत बोलताना कोपरगाव शहरातील तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत चोरीला गेली असल्याची तक्रार एकाने केल्याचे समोर आले आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी ई मेलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच कोपरगाव शहर पोलिसांना याबाबत तक्रार केली. यामुळे तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या कार्यालयाची संरक्षण भिंत चोरी गेल्याच्या या तक्रारीने कोपरगाव शहरात चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा -'माझ्या जीवाला धोका, प्लीज मला घेऊन चला'; रुपाली चाकणकरांनी टि्वट केला रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ
गुन्हा दाखल करण्याची मागणी -
कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तलाठी तसेच मंडळाधिकारी कार्यालय आहे. यास संरक्षण भिंत बांधण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव येथील अभियंत्यांनी येथे भिंत बांधली होती. 2019मध्ये या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी 2 लाख 84 हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी सदरची भिंत अस्तित्त्वात नसल्याने याचा अर्थ ही भिंत चोरी झालेली आहे. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सदर भिंत चोरी झालेली आहे. तिचा तपास व्हावा व संबंधित गुन्हेगाराला गजाआड टाकावे, विकल्पाने जर ही भिंत बांधलीच गेली नसेल तर दिवसाढवळ्या शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.