एजबॅस्टन :भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज ( 9 जुलै ) पार पडला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी धुव्वा उडवला. तसेच, मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांचे लक्ष ठेवले. मात्र, इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर गुंडाळला गेला. भुवनेश्वर, बुमराह, चहलने उत्तम गोलंदाजी करत हा सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात घातली ( India defeated England by 49 runs ) आहे.
प्रथम फलंदाजी भारताकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडी आली. दोघांनीही दमदार खेळीला सुरुवात केली. मात्र, इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहितला 31 धावांवर माघारी पाठवलं. नंतर पंत (26) आणि कोहली (1) यांना एकाच षटकात ग्लीसननेच त्यांची विकेट घेतली. भारतीय फलंदाज एका मागे एक बाद होऊ लागले. पण, रवींद्र जाडेजाने अनुभवाची कमाल दाखवत 29 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या.