हैदराबाद - येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या विंडीजविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दिमाखदार विजय नोंदवला. कणर्धार विराटच्या नाबाद ९४ धावांच्या अप्रतिम खेळीमुळे भारताला हा विजय सहज साध्य करता आला. या सामन्यात जेवढी विराटच्या खेळीची चर्चा झाली त्यापेक्षा त्याने केलेल्या 'नोटबुक' सेलिब्रेशनची चर्चा अधिक झाली.
हेही वाचा -बारामतीचे सतीश ननवरे तिसऱ्यांदा 'आयर्नमॅन'
विराटने केसरिक विल्यम्सविरूद्ध केलेल्या या सेलिब्रेशनमागे खास इतिहास दडला आहे. सामना संपल्यानंतर विराटनेच या इतिहासाचा उलगडा केला. समालोचक संजय मांजरेकरांनी या सेलिब्रेशनमागचे कारण विचारले असता विराटने उत्तर दिले. 'जमैकामध्ये विल्यम्सने मला बाद केले होते. आणि त्यानंतर त्याने नोटबुक सेलिब्रेशन केले होते. म्हणून आजही माझ्याकडून तसे घडले', असे विराटने म्हटले आहे.
'कसेही असले तरी शेवटी आम्ही एकत्र आलो. सामन्यानंतर हात मिळवला. दिवसाच्या अखेरीस सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य होते. प्रतिस्पर्ध्याचा नेहमी आदर ठेवला पाहिजे', असे विराटने म्हटले आहे. या सामन्यात भारताने २०८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ६ विकेट्सने विजय मिळवला. विराटने विंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ६ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले.