इंदूर- सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी होळकर क्रिकेट मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात महाराष्ट्राने रेल्वेवर २१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह महाराष्ट्राने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना निखिल नाईकच्या ९५ धावांच्या जोरावर १७७ धावा केल्या. निखिलच्या या वादळी खेळीत ८ षटकार आणि ४ चौकांरांचा समावेश होता. रेल्वेचा गोलंदाज अमित मिश्राच्या एकाच ओव्हरमध्ये निखिलने तब्बल ५ षटकारांची आतषबाजी केली.
अखेरच्या २० व्या ओव्हरमध्ये चौथा चेंडू वगळता इतर पाचही चेंडूत षटकार खेचण्याचा पराक्रम करत निखिलने ५८ चेंडूत ९५ धावा फटकावल्या. निखिलसोबत महाराष्ट्राचा खेळाडू नौशाद शेखनेही ५९ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागादारी केली.
या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या रेल्वेचा संघ १५६ धावाच करु शकला. त्यांचा २१ धावांनी पराभव झाला.
सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील असलेल्या निखिल नाईक हा या वर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. २० लाखांची बोली लावत केकेआरने त्याला संघात घेतले आहे. यापूर्वी निखिलने २०१६ ला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. पंजाबसाठी त्याने २ सामने खेळताना २३ धावा केल्या होत्या.