मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेसंदर्भात आज (मंगळवार) बीसीसीआय आणि आठही फ्रँचायझी मालकांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक होणार होती. पण ती बैठक रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी कोरोनाची परिस्थिती सुधारली तर ठीक अन्यथा आयपीएल रद्द करावे लागले तरी हरकत नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे आयपीएल होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया पीटीआयशी बोलताना म्हणाले की, 'मानवता प्रथम आहे, यानंतर सर्व येते. आतापर्यंत परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. जर सद्य परिस्थिती सुधारली नाही तर त्याबद्दल बोलण्यात काही अर्थच नाही. आयपीएलचे आयोजन नाही झाले तरी चालेल.'
पुढे बोलताना ते म्हणाले, 'सद्या आयपीएलचा विचार करण्याचा अर्थ नाही. संपूर्ण देश लॉकडाउन आहे. आपल्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही बाब आयपीएलपेक्षा महत्वाची आहे.'