वेलिंग्टन - भारतीय संघासाठी बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. भारताने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला पाणी पाजल्यावर टी-२० मालिकेत भारताची पराभवाने सुरुवात झाली. भारताचा असा पराभव होईल असे कुणालाच वाटले नव्हते. पहिल्या टी-२० सामन्यात ८० धावांनी पराभव झाला. या विजयाचा हिरो ठरला तो युवा यष्टीरक्षक टिम सीफर्ट. त्याने ४३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची खेळी केली. त्याच्या या धुव्वाधार खेळीमुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
२४ वर्षीय टिम सीफर्टचा जन्म १४ डिसेंबर १९९४ साली झाला. त्याला फक्त ९ टी-२० तर ३ एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याची कालची खेळी पाहता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे असे वाटतही नव्हते. सीफर्टने टी-२० मध्ये मागील वर्षीच वेलिंग्टनमध्ये पदार्पण केले होते. मध्यक्रमात खेळणारा सीफर्ट गुप्टिलच्या दुखापतीनंतर सलामीला खेळण्यास आला.