ICC सोबतच्या करारामुळे भारताला पाकिस्तानसोबत खेळावे लागणार
विश्वचषकातील सर्व सामने हे ठरल्याप्रमाणेच होतील.
Dave Richardson
कराची - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सोमवारी सांगितले, की आगामी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याला कोणतीही अडचण नाही. दोन्ही संघ आयसीसीसोबत खेळण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यामुळे १६ जूनला मँचेस्टर येथे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा वेळापत्रकानुसारच होईल
गेल्या महिन्यात पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० पेक्षा जास्त भारतीय सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही पातळीवर क्रिकेट संबंध ठेवू नये अशी जोरदार मागणी होत होती. त्यामुळे भारत-पाक सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विश्वचषकातील सर्व सामने हे ठरल्याप्रमाणेच होतील.
रिचर्डसन म्हणाले की, विश्वचषकातील सर्व सहभागी संघांनी एका करारावर स्वाक्षरी केली असल्याने प्रत्येक संघाला प्रत्येक सामना खेळणे आवश्यक आहे. जर एखाद्या संघाने खेळण्यास नकार दिला तर विरोधी संघाला गुण दिले जातील.