नवी दिल्ली - भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेकडे लक्ष देणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात महत्त्वाच्या क्रिकेटपटूचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून संघाबाहेर असलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. आयपीएलदरम्यान भुवनेश्वर दुखापतग्रस्त झाला होता.
भुवनेश्वरव्यतिरिक्त मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात परत आणले जाऊ शकते. यंदा टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन सर्व गोलंदाजांना आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की भुवनेश्वर कुमार परत येऊ शकतो. याशिवाय शमी मर्यादित षटकांचे काही सामने खेळेल. टी. नटराजन आणि नवदीप सैनीही एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात पुनरागमन करतील.