मुंबई - देशात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. या कारणाने बीसीसीआयने सर्व वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याच्या निर्णय घेतला आहे. आयपीएलचा १४वा हंगाम संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला येईल, असे बीसीसीआयने सांगितलं आहे. दरम्यान, आयपीएलचा २०२१ चा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने राज्यांमधील क्रिकेट मंडळांना पत्र लिहित यासंदर्भातील माहिती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कोरोना परिस्थितीचा संदर्भ देत सध्या सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या शहरात होते. त्यामुळे प्रवास तसेच बायो बबलसारख्या गोष्टींची आवश्यकता भासते. यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.