मुंबई - ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहे.
महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे. प्रेक्षकांची या मालिकेला खास पसंती मिळतेय.