मुंबई - बॉलिवूडच्या अॅक्शनपटांसाठी रोहित शेट्टी ओळखला जातो. रोहित शेट्टीने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. यापैकी 'गोलमाल' हा चित्रपट त्याच्या खूप जवळचा आहे. 'गोलमाल' चित्रपटांच्या सर्वच सीरिजने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. हा चित्रपट तयार करताना खुद्द रोहितलाही वाटले नव्हते, की या चित्रपटाला प्रेक्षकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळेल.
अलिकडेच एका माध्यमाशी बोलताना रोहित म्हणाला की 'ज्यावेळी 'गोलमाल'च्या पहिल्या भागाची सुरुवात केली होती, तेव्हा हा चित्रपट एवढा चांगला चालेल, असे वाटले नव्हते. हा माझ्यासाठी फक्त एक विनोदी चित्रपट होता. मात्र, आज हा मोठा ब्रँड झाला आहे'.
'गोलमाल- फन अनलिमिटेड' या चित्रपटात अजय देवगन, अर्शद वारसी, शर्मन जोशी, तुषार कपूर आणि परेश रावल अशी स्टारकास्ट होती. १४ जुलै २००६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा हा एक कॉमेडी पॅकच होता.
त्यानंतर २००८ साली 'गोलमाल रिटर्न्स' चित्रपट प्रदर्शित झाला. २०१० साली 'गोलमाल -३' चित्रपटानेही प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यानंतर जवळपास ६ वर्षे 'गोलमाल'च्या सीरिजला ब्रेक देऊन '२०१७' मध्ये 'गोलमाल अगेन' हा चित्रपट तयार करण्यात आला.
'गोलमाल' चित्रपटाशी करिना कपूर खान, अमृता अरोरा, कुणाल खेमु, श्रेअस तळपदे, तब्बु, जॉनी लिव्हर, मिथुन, आणि परिणीती चोप्रा यांसारख्या कलाकारांची नावे जोडली गेली. टीव्हीमुळे 'गोलमाल' चित्रपट घराघरात लोकप्रिय झाला, असेही रोहितने म्हटले आहे.
त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'गोलमाल' ते 'सिंबा' चित्रपटांपर्यंतच्या प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'गोलमाल' चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सध्या रोहित शेट्टी 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या तयारीत आहे. 'सिंघम', 'सिंबा' नंतर आता अक्षय कुमारसोबत तो कॉप ड्रामा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.