चीनमध्ये उगम झालेल्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मात्र, इटलीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीमध्ये या विषाणूचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर सुमारे साडेबारा हजार रुग्णांचा यात बळी गेला आहे. इटलीची आरोग्य व्यवस्था ही जगात दुसरी सर्वोत्तम मानली जाते. तरीही या विषाणूचा कहर इटलीमध्ये पहायला मिळत आहे. अशा वेळी भारताने इटलीला लागलेली ठेच पाहून काय शिकावे..?
- परिस्थितीचे गांभीर्य ओळखा..
पहिली गोष्ट म्हणजे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. सध्या भारतात परिस्थिती तितकी गंभीर नाही हे खरे आहे. मात्र, तरीही आपण काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू कोणतेही लक्षण न दाखवताही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एक ते दोन आठवडे राहू शकतो. त्यामुळे आपण 'फिट' आहोत, म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही किंवा झालेला नाही, हा गैरसमज पाळू नये.
इटलीच्या नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनीही परिस्थिती गांभीर्याने नाही घेतली. एका कार्यक्रमादरम्यान, इटलीमधील बरेच नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना आढळून आले होते. कोरोनासंबंधी संपूर्ण जगात माहिती पसरल्यानंतरची ही बाब आहे. शिवाय इटलीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही तेथील सरकारने कडक पावले उचलण्यास वेळ लावला, ज्याची फळे ते आता भोगत आहेत.
- अर्ध्या हळकुंडावर पिवळे होऊ नका..
कोरोना विषाणूशी लढा द्यायचा असेल तर त्यासाठी अपुरे उपाय अवलंबून काहीच फायदा होणार नाही. संपूर्ण देशात म्हणजेच अगदी जिथे विषाणू पोहोचला नाही तिथेही खबरदारीचे उपाय लागू करणे आवश्यक आहे.
इटलीने सुरूवातीला देशात ज्या-ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्या भागांना रेड झोन घोषित केले. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये खबरदारीचे उपाय लागू करण्याऐवजी, केवळ त्या रेड झोन्सना बंद केले. त्यामुळे त्या भागांमधील लोकांनी कमी निर्बंध असणाऱ्या भागांकडे स्थलांतर करण्यात सुरू केले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होतच राहिला. त्यानंतर जेव्हा प्रशासनाला लक्षात आले, की आपल्या उपायांनी विषाणूचा प्रसार थांबत नाहीये, आणि देशातील रेड झोन्सची संख्या वाढतच आहे, तेव्हा त्यांनी देशभरात निर्बंध लागू केले.