नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये गोदावरी पात्रातील काँक्रेटिकरण काढण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा गोदावरी मोकळा श्वास घेणार असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. हे काँक्रिट हटवल्याने नदी पात्रातील 17 प्राचीन कुंड आणि नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोदा प्रेमींच्या लढ्याला यश आले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांमध्ये गोदावरी पात्रातील काँक्रेटिकरण काढण्यात येणार आहे. सन 2003 मधील कुंभमेळ्यासाठी केलेल्या विकासकामांमध्ये गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरण करण्यात आले. हे काम करताना प्रशासनाने नदीपात्रातील प्राचीन 17 कुंड सिमेंट-काँक्रिटने बुजवले होते. यामुळे नैसर्गिक जलस्रोत देखील लुप्त झाले.
नदी पात्रातील हे काँक्रिटीकरण हटवण्यासाठी गोदाप्रेमींकडून कायदेशीर लढा सुरू झाला. याआधी अनेकदा उच्च न्यायालयाने मनपा प्रशासनाला या मुद्द्यावरून फटकारले आहे.
शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्याने या प्रकल्पांतर्गत विकासकामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये 'प्रोजेक्ट गोदा' हा महत्त्वाचा टप्पा आहे. संबंधित प्रकल्पात पात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे प्रस्तावित असल्याने गोदाप्रेमींसह नाशिककरांनी देखील याचे स्वागत केले. काँक्रिटीकरण काढण्यासंदर्भात अंतिम नकाशा तयार करण्यात आला असून यामध्ये 17 प्राचीन कुंड व नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.
या कामाची सुरुवात येत्या शुक्रवारी होळकर पुलाजवळील गांधी तलावापासून करण्यात येणार असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.