महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2020, 1:09 AM IST

ETV Bharat / city

नाशिकमधील किराणा दुकानांना नसणार वेळेचे बंधन; 'सम-विषम'मधूनही होणार सुटका..

शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही प्रामुख्याने दुकानांच्या वेळेवर असलेल्या मर्यादेमुळे आणि दुकाने कमी काळ सुरू राहत असल्याने होत आहे. याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदींचा वापर करून दुकानांचा कार्यकाळ वाढल्यास, गर्दी विखुरली जाऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सुकर होईल असे सर्वमताने ठरवण्यात आले.

Grocery and other shops  will now be full time open in Nashik except for containment zones
नाशिकमध्ये आता किराणा दुकानांना नसणार वेळेचे बंधन; 'सम-विषम'मधूनही होणार सुटका..

नाशिक : गुरुवारपासून शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील दुकाने व व्यावसायीक आस्थापनांना वेळेचे बंधन किंवा मर्यादा असणार नाही. यासोबतच सम-विषम हा नियम किराणा दुकाने, मेडिकल्स व वैद्यकीय सेवांना लागू नसणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बैठकीत बुधवारी हे निर्णय घेण्यता आले आहेत.

शहरातील वाढत्या करोना संसर्गास पायबंद घालण्याच्या दृष्टीने बुधवारी शहरातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. कोरोना संसर्गाशी लढताना नाशिककरांनी आजपर्यंत प्रशासनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच जिल्ह्यातील व शहरी क्षेत्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी यापुढेही नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला लागणार आहे. परंतु सद्यस्थितीत शहरी भागात होणारी गर्दी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडली.

शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही प्रामुख्याने दुकानांच्या वेळेवर असलेल्या मर्यादेमुळे आणि दुकाने कमी काळ सुरू राहत असल्याने होत आहे. तसेच, काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने एक दिवसाआड बंद राहिल्याने नागरिक या वस्तूंचा संचय करण्यासाठी गर्दी करीत असतात, अशी बाब निदर्शनास आली. याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदींचा वापर करून दुकानांचा कार्यकाळ वाढल्यास, गर्दी विखुरली जाऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सुकर होईल असे सर्वमताने ठरवण्यात आले. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतले असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

या निर्णयांसोबतच, येणाऱ्या काळात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यावर, आणि त्यातून संशयितांच्या शिस्तबद्ध विलगीकरणावर भर देण्यात येणार आहे. तसेच, फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येक दुकानदारास आपल्या दुकानात अथवा दुकानाच्या परिसरात सोशल फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे किंवा नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये लागू असणारे निर्बंध येणाऱ्या काळात अत्यंत कठोरतेने अंमलात आणले जातील. तसेच, ज्या व्यवसायांना, दुकानांना बंदी घालण्यात आली आहे, अशी दुकाने व आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे काही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढील निर्णय घेतले -

  • दुकाने व आस्थापनांना वेळेची मर्यादा नसेल.
  • सम-विषम निर्बंधातून किराणा दुकाने, वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
  • कन्टेन्मेंट झोनमधील निर्बंध अधिक कठोर करणार.
  • फिजिकल डिस्टन्सिंगचे होणार कठोर पालन; उल्लंघन झाल्यास दुकानदारांवर कारवाई होणार.
  • बंदी घातलेल्या दुकानांनी निर्बंधांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करणार व कठोर स्वरूपाची फौजदारी कारवाई करणार.

हेही वाचा :नाशकात सलून व्यवसायिक रस्त्यावर; दुकानं सुरू करण्यासाठी जेलभरो आंदोलनाचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details