नागपूर - कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. एकीकडे लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातही अनेक ठिकाणी रुग्णांची लूटमार सुरु असल्याच्या बातम्या येत आहे. सर्वत्रच सामाजिक भान हरपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु अशा आणीबाणीच्या काळात देखील माणुसकी धर्म जिवंत असल्याचे उदाहरण नागपुरात पाहायला मिळाले.
असे म्हणतात की रक्ताचे नातलग उपयोगात पडणार नाहीत, पण शेजारचे आणि जिवाभावाची मित्रमंडळी संकटाच्या वेळी धावून येतील. मात्र कोरोना महामारीच्या या संकटात हा समज देखील गळून पडला. कोरोनाच्या भीतीपोटी नैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतदेहाकडे देखील संशयाच्या नजरेतून लोक बघू लागले आहेत.
नातेवाईक व सगे-सोयऱ्यांनीही राखले अंतर -
अशीच एक घटना नागपूर शहरात घडली आहे. खरबी भागात राहणारे श्रीराम बेलखोडे नामक एका व्यक्तीचा (रविवारी) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तर सोडाच सगे-सोयऱ्यांनी देखील भीतीपोटी आपल्या घराचे दार बंद करून घेतले होते. तब्बल पाच तास मृतदेह घरात पडून असल्याची माहिती समजताच सलमान रफिक नामक तरुणाने पुढाकार घेऊन श्रीराम बेलखोडे यांच्यावर हिंदू धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले. सलमान रफिक खान याने आपल्या इतर मित्रांच्या मदतीने अंतिम विधीसाठी साहित्य आणले, स्वतः खांदा दिला व हिंदू रितीनुसार मृतदेहावर दिघोरी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. त्यानंतरच सलमानने रोजा सोडला. सलमान हा शिवसैनिक असून युवासेनेचा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.
कोरोना महामारीमुळे आपलेच नातेवाईक आपले राहिले नाहीत. ज्यांना सर्वात जास्त जवळचे समजले जायचे तेच अंतर राखून आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची हिंमत तुटायला लागली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे माणुसकी देखील जगात शिल्लक राहिलेली नाही, अशी उदाहरणे सर्रासपणे बघायला मिळत असताना नागपूर शहरातील एका मुस्लिम तरुणाने निष्ठूर झालेल्या समाजाला माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सर्वाना वाटले की श्रीराम बेलखोडे यांचा मृत्यू कोरोनाने झाला असावा. त्यामुळे नातेवाईक, शेजारी, मित्र त्यांच्या घराचा उंबरठा देखील ओलांडायला तयार नव्हते. श्रीराम बेलखोडे यांच्या मृतदेहाजवळ केवळ त्यांची पत्नी, एक मुलगी आणि लहान मुलगा होता. या संकटाच्या वेळी नातेवाईक आणि आजूबाजूच्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार -