नागपूर -एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की पुढील ५० वर्ष मीच मुख्यमंत्री असेल, यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशावादी आहेत, ते स्वप्न बघत असतील तर यामध्ये काहीही गैर नाही, कारण स्वप्न बघायला श्रम आणि पैसा दोन्ही लागत नसल्याचा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे. याशिवाय त्यांनी जैतापूर प्रकल्प आणि राज्यात आलेल्या गुंतवणुकीच्या मुद्यावरून शिवसेनेला खडे बोल सुनावले.
एफडीआय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राची तिसऱ्या स्थानी घसरण -
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात गुंतवणूक येत असले तर याचा आम्हाला आनंद आहे. मात्र यावर्षी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर घसरलेला आहे. आमच्या काळात गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पाहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या तीन राज्यात आलेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षाही जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली होती. आज गुजरातमध्ये १ लाख१९ हजार ५६६ कोटी गुंतवणूक आली आहे तर कर्नाटकमध्ये २७ हजार ४५८ कोटी गुंतवणूक आली आहे आणि आपल्या राज्यात मात्र २७ हजार १४३ कोटींची गुंतवणूक आलेली आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हा तिसऱ्या स्थानी घसरला आहे आणि ही चिंतेची बाब असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री आशावादी, माझ्या शुभेच्छा-फडणवीस