नागपूर - राज्यात पूरग्रस्त परिस्थिती आणि भूस्खलनामुळे आलेल्या आपत्तीमधील पीडित कुटुंबाना तात्काळ 10 हजारांची मदत आणि अन्न धान्य वाटपाला उद्यापासून सुरवात होणार, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यावर आलेल्या आपत्तीने प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे केंद्रीय पथकाने तात्काळ पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
या महापुरामुळे राज्यभरात 169 लोकांचा मृत्यू झाला असून 55 लोक जखमी झाले आहेत. सर्वांची ओळख पटली असून एक जण बेपत्ता आहे, असेही ते म्हणालेत. केवळ कोकणालाच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर यासोबत मराठवाड्यात नांदेडसह अन्य भागांना पुराचा फटका बसला आहे. जवळपास 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले असून, हे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
या महापुरात रस्त्याचे जवळपास 1 हजार 800 कोटीचे नुकसान झाले आहे. तेच वीज वितरण व्यवस्थेचे 400 कोटींच्या घरात नुकसान झाले आहे. या महापुरामुळे अनेक शहरात आणि गावांमध्ये अजूनही चिखल साचलेला आहे, नुकसानीचे पंचनामे झाले नाही. सर्व पंचनामे करायला किमान आठ दिवस जातील. यासोबत चिपळूण, महाळ, सांगली, सातारा या भागात सर्वात जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तात्काळ मदत म्हणून उद्यापासून 10 हजार रुपये बँक खात्यात द्यायला सुरुवात होईल. हे पैसे रोख दिल्यास गोंधळ, भष्ट्राचार असे अन्य प्रकार टाळण्यासाठी ही मदत बँक खात्यात दिली जाईल. यासोबत प्रत्येकी पाच किलो गहू, तांदूळ, 5 लिटर केरोसीन वाटप केले जाणार आहे. यासोबत राशन कार्ड, आधारकार्डसारखे सर्व रेकॉर्ड महापुरात खराब झाल्याने फोटो काढून त्यालाच नुकसान भरपाई देण्यासाठी ग्राह्य धरले जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
केंद्राचे मानले आभार?
केंद्राने जाहीर केलेली 700 कोटींची मदत ही मागील वर्षात ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीची आहे. ही मदत दिली त्यासाठी आभार आहे, असे म्हणत 3 हजार 721 कोटींची मदत मागितली असताना केवळ 700 कोटी दिले, असे वडेट्टीवार म्हणाले. यासोबत केंद्रीय पथकाने भागाची पाहणी करून लवकरात लवकर अहवाल द्यावा, आणि मदत जाहीर करावी. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांनी ज्या पद्धतीने नुकसान होताच गुजरातचा दौरा केला, त्याच पद्धतीने महाराष्ट्र्राचाही दौरा करावा आणि जशी विना पंचनामे करत मदत जाहीर केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रालासुद्धा मदत द्यावी, असेही वडेट्टीवार म्हणालेत.
अल्प दारात कर्ज देण्यासाठी चर्चा