मुंबई - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या लालपरीने आज 73 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, या 73 वर्षांत महाराष्ट्राचे ओझं वाहणारे एसटी महामंडळ आज आर्थिक डबघाईला आली आहे. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात कोरोनामुळे एसटी महमंडळाचा संचित तोटा 4 हजारावरून आज चक्क 9 हजार कोटीच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे महामंडळाला तोट्यातून बाहेर काढाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून यासाठी प्रयत्न करायला हवेत.
इतका आहे तोटा -
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षांपासून संपूर्ण जगाचे अर्थचक्र मंदावलेले आहे. या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग धडपड करत आहे. एसटी महामंडळात सुद्धा याच परिस्थितीतून जात आहे. गेल्या 73 वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवासी दळणवळणाची सेवा देणारी एसटी आता कोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. 4 हजार 549 कोटी रुपयांचा तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या 3 हजार 800 कोटीं रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रचंड तोटा वाढलेला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 9 हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. त्यामूळे एसटी महामंडळ आर्थिक गर्तेत अडकलेली आहे.
एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 2014 -15 आर्थिक वर्षातमध्ये 1 हजार 685 कोटी रुपये होता. नंतर प्रत्येक वर्षी हा तोटा हळूहळू वाढत गेला आहे. 2018-19 आर्थिक वर्षांत 4 हजार 549 कोटीवर जाऊन पोहचला होता. 2020-21 या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा 9 हजार कोटीच्या घरात जाऊन पोहोचला आहे.
संचित तोट्याची आकडेवारी -
2014-15 = 1685 कोटी
2015-16 = 1807 कोटी
2016-17 = 2330 कोटी
2017-18 = 3663 कोटी
2018-19 = 4549 कोटी
2019-20 = 5192 कोटी
2020-21 = 9500 कोटी
राज्य शासनाने आर्थिक मदत करावी -
कोरोनामुळे एसटी महामंडळ गेल्या एका वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. सध्या महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाहीत. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासाठी राज्य शासनाने 1 हजार कोटी रुपयांची महामंडळाला मदत केली होती. मात्र, तो निधी संपलेला असून कोरोनाची परिस्थिती पुन्हा वाढत आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे शासनाने एसटी महामंडळाला वाचवण्याकरिता भरीव आर्थिक मदत करावी तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत करावी, अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारताला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.