मुंबई -महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता न आल्याने, अखेर आज मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. याबाबत राज ठाकरे यांनी आपली भूमिका ट्विटरवर मांडली. 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे', अशा भाषेत राज ठाकरेंनी राज्यातील सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्ष आणि नेत्यांवर टीका केली आहे.
हेही वाचा... राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू; जाणून घ्या कलम ३५६
.... ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा घोर अपमान केला आहे - राज ठाकरे
स्पष्ट बहुमत आणि जनादेश असतानाही राज्यात युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. शिवसेना, भाजप आणि आघाडीतील पक्षांच्या असफल राजकारणामुळे राज्यात आज अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. या सर्व घटनांना हे प्रमुख पक्ष आणि नेते जबाबदार असल्याचे गृहीत धरून राज ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख 'नतदृष्टे' असा केल्याचे दिसत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनीच महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा... राज्यपालांची भूमिका संशयास्पद - प्रकाश शेंडगे
24 ऑक्टोबरला राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यात राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेली खेचाखेच, यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. यानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षात भाजप, शिवसेना आणि अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसलाही सरकार स्थापन करण्यात यश न आल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.