मुंबई -सध्या जगावर केमिकल वॉरचे संकट आहे. त्यात आता देशात प्रथमच पहिल्यांदाच ( First Time In India ) महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलिसांनी केमिकल आणि गॅस वाहणाऱ्या वाहनांसाठी एक नवीन नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले ( Rules For Chemical And Gas Transport ) आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून केमिकल आणि गॅस टँकरच्या अपघातांमध्ये मोठी जीवितहानी टळली असली तरी राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. त्यामुळे भविष्यात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी होवू नयेत. तसेच अपघातानंतर तात्काळ वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवी नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
गॅस टँकरची झाडाझडती - गेल्या दोन आठवड्यात लोणावळा औरंगाबाद आणि धुळे या ठिकाणी सलग गॅस आणि केमिकल वाहून नेणारे टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती. विशेष म्हणजे केमिकल आणि गॅस सारख्या टँकरचे वाढत जात असलेल्या अपघातामुळे महामार्गवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, राज्यातील 20 हजार केमिकल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची 8 दिवसांत झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहेत. याशिवाय केमिकल व गॅसची माहिती असलेल्या तज्ञांच्या मदतीने लवकरच या वाहनांसाठी अपघातानंतर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे.