मुंबई- दिव्यांग विकास महामंडळाकडून १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज घेतल्याची खोटी नोंद केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत केला. राज्य सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करुन त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर खोटे कर्ज - प्रकाश गजभिये
राज्यातील १०९ शेतकऱ्यांनी दिव्यांग महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र दिव्यांग महामंडळातील अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर खोटे कर्ज घेतल्याच्या नोंदी केल्याचा आरोप प्रकाश गजभिये यांनी केला.
बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यात दिव्यांग शेतकरी सर्वाधिक आहेत. या दिव्यांग शेतकऱ्यांनी दिव्यांग विकास महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केला. त्यासाठी पुरावे म्हणून स्थावर मालमत्तेचे कागदपत्र दिली. मात्र महामंडळातील अधिकाऱ्यांनी त्या दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज घेतल्याची खोटी नोंद केली. ज्यामुळे त्या दिव्यांग शेतकऱ्यांना आता दुसरीकडेही कर्ज उपलब्ध होत नाही.
राज्यात आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आहे. या दिव्यांग शेतकऱ्यांच्या नावावर खोटी कर्जाची नोंद करून पैशांचा गैरव्यवहार काही अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोपही आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या महामंडळाचा हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार म्हणावा लागेल असेही आमदार प्रकाश गजभिये म्हणाले.