मुंबई -इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट मिळत नसल्याने एका बोर्डातून दुसऱ्या बोर्डात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीटसोबत मायग्रेशन सर्टिफिकेट देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीकडून शिक्षण मंडळाकडे केली आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
'सर्वच विद्यार्थ्यांना मार्कशीटसोबत स्थलांतर प्रमाणपत्र द्यावे'
एका बोर्डातून दुसऱ्या बोर्डात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता असते जे बोर्डाकडून मिळते. कोरोनाकाळात मागील वर्षी शिक्षण मंडळाकडून ऑनलाइन पद्धतीने मिळत होते. यंदा पण बोर्डाकडून मागच्या वर्षाचीच लिंक देण्यात आली आहे. पण या लिंकमध्ये काही तांत्रिक दोष आहेत. त्यामध्ये दहावी परीक्षेचे केंद्र नंबर, केंद्राचे नाव व वर्ष भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. यंदा दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचे नाव, नंबर कसे टाकायचे असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे बोर्डाने एक तर या लिंकमध्ये आवश्यक तो बदल करावा, अथवा सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना मार्कशीटसोबत स्थलांतर प्रमाणपत्र द्यावे त्यामुळे लिंकच्या किचकट प्रक्रियेतून पालकांना होणारा मनस्ताप वाचेल, असे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
हेही वाचा- VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू