मुंबई -मुंबईत सध्याही कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंधांची आवश्यकता आहे. मुंबईमधील लोकल सुरू करणे किंवा निर्बंध हटवणे याबाबत जो काही निर्णय होईल तो आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी बोलूनच होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
नागरिकांचा जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य -
२५ वर्षाहून अधिक काळ सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्याही ५०० च्या खाली गेलेली नाही यामुळे तिसरी लाट टाळण्यासाठी निर्बंध आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. कोणताही निर्णय घेताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांचा जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य आहे. यामुळे लोकल सुरु करण्याचा निर्णय असो किंवा निर्बंध कमी करण्याचा निर्णय असो टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.