मुंबई - पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सदेखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली. त्याचप्रमाणे हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, असेही सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली.
संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्रदेखील कुठेही मागे नव्हता. तसेच या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये, आग्रही विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून त्या आणखी वाढविण्यात येत असल्याचा विश्वास देताना त्यांनी दिला. लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
चाचण्यांचा वेग चांगला
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटिजेन चाचणी होतात. हे प्रमाण समाधानकरक असले तरी वाढवणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय आरोग्य सचिव यांनी नोंदवले. गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामूळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करुन व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मागणीनुसार लस पुरवठा लगेच व्हावा
मुख्यमंत्री म्हणाले, की प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत. १५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामूळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. २५ वर्षापुढील सर्वाना लसीकरण गरजेचे आहे या मागणीचा पुनरुचार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा
राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविड बाधित रुग्णांची संख्या पाहाता १७००-२५०० मे. टन इतक्या ऑक्सिजनची एप्रिल अखेरपर्यतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळित राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे.
रेमडिसीवीर उपलब्धता