मुंबई - कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, गेल्या पाच ते सहा दिवसात वाढलेले कोरोनाचे रुग्ण या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या संवादादरम्यान मुख्यमंत्री काय बोलणार, पुन्हा लॉकडाऊन लागणार का, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
रुग्ण संख्या वाढली -
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. राज्य आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपली जीवाची बाजी लावत रुग्णांची संख्या आटोक्यात आणली. मात्र लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथिलता धार्मिक सण, उत्सव आदी कारणाने पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. दिवाळीनंतर तर पाचच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पटीहुन अधिक वाढली आहे. यामुळे राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर अंकुश लावण्यासाठी दिल्ली मुंबई विमान सेवा तसेच मुंबई बाहेरून येणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचाही पर्याय सुचवण्यात आला आहे. यावर राज्य सरकारने चर्चा करून दिल्लीत रुग्ण वाढत असल्याने दिल्ली मुंबई विमान सेवा बंद करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे.
मुख्यमंत्री काय बोलणार -
राज्य सरकार कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यामुळे मुख्यमंत्री नागरिकांना मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाण्याचे टाळा आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार आहेत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जनता कर्फ्यू सारखा निर्णय ही मुख्यमंत्री घोषित करू शकतात. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाकडून सतत आरोप केले जात आहेत. त्याला प्रत्युत्तर मुख्यमंत्री देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.