मुंबई - काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनापासून काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्यात कोरोना परिस्थिती भंयकर असून, कोरोना रुग्ण असेच वाढत राहिल्यास राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल असेही म्हटले. दरम्यान यावर भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. राज्यातील जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या संकट काळात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र सरकारने सर्व घटकांचा विचार करून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.
जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे
भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या संवादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्हाला कोरोनाच्या काळात कोणतेही राजकारण करायचं नाही. आम्ही लोकांच्या मदतीसाठी पहिल्या लॉकडाऊनपासून रस्त्यावर आहोत, आणि पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले तरी आम्ही लोकांची मदत करू, आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारसोबत आहोत. फक्त सरकारने समाजातील सर्व घटकांचा विचार करून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा. इतर राज्याने कोरोना काळात जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत, मात्र महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत असे एकही आर्थिक पॅकेज अद्याप जाहीर केलेलं नाही. सरकारने जनतेला मदत केली पाहिजे.