मुंबई -उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला ठेवली आहे. त्यानंतर लगेच अभिनेत्री दिपाली सय्यद ( Actress Deepali Sayyad Appeal ) यांनी ट्विट करत अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चा केली तर मार्ग निघेल, असे आवाहन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना केले आहे.
काय म्हणाल्या दिपाली सय्यद -सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे. यातून त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली तर मार्ग निघेल. याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली, तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र असे ट्विट केले आहे.
दिपाली सय्यद यांनी अगोदरही केले होते आवाहन -शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या अगोदरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याविषयी वक्तव्य केले होते. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र यानंतर शिवसेनेत चांगलाच वाद उफाळून आला होता.
दिपाली सय्यद शिवसेनेच्या कार्यकर्त्या प्रवक्त्या नाहीत -उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे लवकरच एकत्र येणार असल्याचे विधान शिवसेना नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद ( Deepali Sayyad ) यांनी केले होते. त्यावरुन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत ( Mp Sanjay Raut ) यांनी सय्यद यांचे कान टोचले आहेत. 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही. त्यामुळे विचारपूर्वक बोला,' अशा शब्दात संजय राऊत यांनी दिपाली सय्यद यांना खडसावले होते. त्या अभिनेत्री आहेत, आमच्या पक्षात काम करतात. शिवसेनेच्या त्या नेत्या नाहीत. शिवसेनेच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ता असतील. परंतु, अशा प्रकारची वक्तव्य करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. त्या प्रकारचे वक्तव्य नेतेच करू शकतात. त्यामुळे असे वक्तव्य करण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले, हे मला माहीत नाही, अशा शब्दात राऊत यांनी दिपाली सय्यद यांना खडसावले.