महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 21, 2022, 10:49 PM IST

ETV Bharat / city

शहरे सुरक्षित करण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग'चा पर्याय स्विकारा - एकनाथ शिंदे

शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग' उपक्रमाने सुचवलेले उपाय राज्यातील सर्व मनपामध्ये राबवणे गरजेचे आहे. शहरांचे रूप यामुळे पालटून जाईल, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नगरविकास विभागामार्फत आर्थिक मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

'Ease of Living
'Ease of Living

मुंबई -शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग' उपक्रमाने सुचवलेले उपाय राज्यातील सर्व मनपामध्ये राबवणे गरजेचे आहे. शहरांचे रूप यामुळे पालटून जाईल, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नगरविकास विभागामार्फत आर्थिक मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने व्हाट्सऍप चॅट बॉट आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे सुरक्षित शाळा उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात या बैठकीला मुंबई मनपाचे आयुक्त इकबालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आठ दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हॉट्सएप चॅट बॉट या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन सुविधेमार्फत तब्बल ८० सुविधा चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला हा प्रकल्प इतर मनपांनी देखील राबवावा, यासाठी या सुविधेचे सादरीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. दरम्यान, नगर रचनाकारांच्या मदतीने शैक्षणिक संस्थांच्या परिसर सुरक्षित करण्यासाठी काम करावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना केले.

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या चॅटबॉटमुळे उत्तम सेवा नागरिकांना पुरविता येणार असून त्यामुळे कामकाजाला गती मिळेल, शिवाय पारदर्शकता वाढीस लागणार असून नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून हे चॅटबॉट जनतेला सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. जवळपास दोन वर्षांपासून कोविड-19 महामारीमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहोत. मात्र या काळातही नागरिकांना घरबसल्या आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा प्रकल्प नक्कीच सर्व महानगर पालिकांसाठी पथदर्शी ठरणार आहे. पारदर्शकता, तत्परता याबरोबरच शासनाप्रती विश्वासार्हता वाढविण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच महत्त्वपूर्ण असेल, असे नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले.

राज्याचे वेगाने नागरीकरण होत असताना होणारा विकास हा शाश्वत व्हावा तसेच 'इज ऑफ लिव्हिंग'मध्ये तो बदलण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाचा आढावा वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या संस्थेने सादर केलेल्या सादरीकरणातून मांडण्यात आला. शहरातील शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी अनेक संकल्पना यावेळी सादर करण्यात आल्या. या संकल्पना अत्यंत साध्या आणि सोप्या असून त्याद्वारे शहरांतर्गत नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. असे प्रकल्प राज्यातील महानगरपालिकामध्ये राबवणे शक्य असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने कालबद्ध रीतीने काम करावे लागणार आहे. त्यासाठी नगरविकास विभाग पुढाकार घ्यायला तयार असून महानगरपालिकाना काही निधी द्यायला देखील तयार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details